|

दोन क्रियापदांची मला फारच गंमत वाटते. मराठी माणूस धंद्यात पडतो, उभं राहण्यासाठी पडतो आणि आणि कधीकधी आपल्या वृत्तीमुळे खरोखरच पडतो. तसंच दर वर्षांकरता, नव्या वर्षी आपण काही ना काही संकल्प सोडतो. म्हणजे धरण्यासाठी सोडतो आणि आपल्या वृत्तीमुळे खरोखरच सोडतो.
कदाचित समाजजीवनात आपले प्रतिनिधी आश्वासनं पाळत नाहीत, तसे खाजगी जीवनात आपण संकल्प पाळत नाही! गंमत आहे की नाही? नसेल वाटली तर द्या बुवा सोडून. ज्यांना जीवनातल्या लहानशा गोष्टींतदेखील गंमत दिसते, त्यांच्या मनमोराचा पिसारा फुलतो. ज्यांना दिसत नाही, त्यांचा पिसारा निमूट गप्प!
तर संकल्पाविषयी बोलत होतो. आता आईशप्पत खालील संकल्प कोणी वर्षभर पाळलेत का? खरं सांगा..
रोजच्या दिनक्रमाची डायरी न चुकता लिहायची रोज हिशेब लिहायचा.. पर्स/पाकिटात नेमके किती पैसे होते? किती शिल्लक राहिले? कुठे खर्च केले आणि का केले? याची रुपये आणि पैशांत नोंद करायची.
प्रत्येक मिस्ड कॉलला लगेच कॉलबॅक करायचं.
आलेल्या पत्रं-ईमेलना ताबडतोब रिप्लाय धाडायचे. .. केलंय हे कधी ठरवल्याप्रमाणे नेमानं?
आता आणखी महत्त्वाचे संकल्प : ‘दिवसभरात, घरी आल्यावर कुटुंबियांवर चिडचिड करायची नाही’ किंवा ‘दारू, बिअर वा सिगारेट प्यायची नाही..’ वगैरे.
हे संकल्प केले आणि शंभर टक्के पाळले, असं छातीठोकपणे सांगणारे कुठे आहेत?
संकल्प करूच नका, असं नाही. माझं म्हणणं असंय की संकल्पांमागची सायकॉलॉजी समजून घ्या.
एक जानेवारीपासून किंवा वर्ष-प्रतिपदेला, वाढदिवसाच्या निमित्तानं किंवा अगदी ‘येत्या सोमवारपासून’, ‘पुढल्या एक तारखेला अमुक गोष्ट खात्रीने सोडणार किंवा सुरू करणार असं म्हणणाऱ्या लोकांना भरपूर शुभेच्छा घ्याव्या लागतात. स्वत:च्या इच्छाशक्तीच्या बळावर ते आपापले संकल्प नक्कीच पार पाडू शकत नाहीत. चांगल्या कामाला आरंभ आणि वाईट कामांचा शेवट करायला मुहूर्त शोधायचा नसतो. शुभस्य शीघ्रं आणि अशुभस्य कालहरणं हेच खरं.
आणखी काही मानसिक पदर आहेत. संकल्प सोडणे हा आश्वासनं देण्यासारखा वेळकाढूपणाही ठरू शकतो. तर कधी संकल्प करताना आपण नेमकं काय करणार आहोत, हे ठरवलेलंच नसतं. प्रवासाला जाताना नेमकं ते गाव किंवा ठिकाण, पोहोचण्याचा मार्ग आणि त्यासाठी आवश्यक असणारी वाहनं यांची माहिती नको का? तसंच हे! येऊ शकणाऱ्या अडचणींची माहिती नाही आणि त्यावर उपायही ठरलेले नाहीत, तोवर काही खरं नाही. खरंतर, संकल्पापेक्षा, तो पूर्ण करण्यात कोणते अडथळे येतील, त्यांच्यावर मात कशी करायची, याचं प्लॅनिंग करणं जास्त महत्त्वाचं.
असं सहसा होत नाही. करताही येत नाही.
कारण आपण संकल्प सिद्धीला नेणारे यंत्र नसतो की यंत्रमानव नसतो. आपल्या आयुष्यात प्लॅनिंग महत्त्वाचं तितकीच उत्स्फूर्ततात! आखीवरेखीव संकल्प-पालनाच्या युक्त्या माहीत असायला हव्यातच, पण मौजमजा करत, चुकत माकत, जुन्या परंपरा झुगारून नवे मार्ग शोध जगण्यातही गंमत असते ना!
विलक्षण शिस्तशीरपणे काम करणाऱ्या, काटेकोरपणे जगणाऱ्या लोकांची खरं म्हणजे भीतीच वाटते. आपल्यावर कोणीतरी छडी घेऊन पहारा करतंय, संकल्पाप्रमाणे वागत नसल्यास शिक्षा करील, असं दडपण काय कामाचं? म्हणूनच संकल्प सोडण्यात मजा आहे तशी तोडण्यातही आहे. त्यामुळे एक जानेवारीपासूनचा म्हणून केलेला संकल्प अगदी आज तीन जानेवारीला मोडला असेल, तरी हरकत नाही. हाच संकल्प पुढल्या वर्षांकरता राखून ठेवू.. तोपर्यंतचे दिवस तर आपलेच आहेत.. जिओ जी भरके!
डॉ. राजेंद्र बर्वे
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
|