'जगणं उलगडताना' पुस्तकाविषयी - ( रत्ना हिले ) Print E-mail
यांच्या द्वारा - रत्ना हिले   

आताच डॉ. संजय ओक यांचं 'जगणं उलगडताना' पुस्तक वाचून झालं. हे पुस्तक म्हणजे लोकसत्ताच्या पुरवणीमधून वेळोवेळी प्रकाशित झालेल्या लेखांचा संग्रह आहे. यापूर्वीही यातील काही लेख वाचनात आले होते ते पुन्हा वाचताना 'जुने काहीतरी ओळखीचे' भेटल्याचा आनंद झाला आणि काहींची नव्याने ओळख झाली.

सरांनी त्यांच्या पुस्तकात त्यांच्या आयुष्यातील नेहमीचेच प्रसंग चितारलेले आहेत..आपल्याही आयुष्यातील नेहमीचेच प्रसंग पण आपण त्याकडे सजगतेने, वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिले की तेच आपल्याला वेगळे दिसू लागतात. कधी एखाद्या कठीण प्रसंगात, इतकी वर्ष आपण ज्यांना आपले मित्र म्हणवतो, त्यांचाच मुखवटा अचानक गळून पडतो आणि ते आपले हितचिंतक कधीच नव्हते याची जाणीव होते. अचानक एखादी वीज चमकून जावी तसे आपल्याला त्यांच्याविषयी काहीतरी लख्ख दिसून जातॆ..

माझ्याही आयुष्यात असेच काहीतरी घडले होते..मनाला क्लेशदायक ठरणारे असेच काही क्षण घेऊन मी पुढे चालणार  होते..माझ्या बाबतीत घडलेल्या प्रसंगानंतर रोजच संपर्क येणा-या त्या व्यक्तीशी मी कसे वागावे सुचत नव्हते..पण अंतरात्म्याचा आवाज आला काही काळासाठी माघार घे..विशेष काही घडले नाही असे भासू दे..यावर काळच याचे काय ते उत्तर देईल..

या प्रसंगानंतर योगायोगाने ओक सरांचाही 'माघार' या शब्दाचे सामर्थ्य दाखवणारा लेख वाचनात आला. त्यांनी आपल्या लेखात लिहिलंय "माघार ही हार नसते. माघार ही मिटून संपल्याची साक्षही नसते. माघार म्हणजे मागासलेपण नव्हे आणि माघार म्हणजे 'सीदन्ति मम गात्राणि, मुखंच परिशुष्यति' म्हणून गाळलेलं अवसानही  नव्हे. माघार अवसानघातकी नसून अवधानी चाणाक्षतेची चुणूक आहे, असं माझ मत आहे. माघार म्हणजे पराभव नव्हे तर लांबणीवर टाकलेला विजय आहे."

लेख वाचून झाल्यावर अचानक काहीतरी सापडल्यासारखं वाटलं...वाटलं आपला निर्णय योग्यच होता. माझ्याही बाबतीत घडलेल्या प्रसंगात त्या व्यक्तीला तिची चूक कळली असली तरी तिच्याकडे मनाचा एवढा मोठेपणा नव्हता की तीने आपली चूक कबूल करावी..मी तिच्याशी पूर्वीसारखीच सांघिक भावनेने वागते, तिच्या कामातील अडी-अडचणीत मदत करते..ती ही संवेदनशील असल्याने तिलाही आमच्यात वाढलेलं अंतर जाणवतं आणि माझ्याबरोबरच्या प्रत्येक प्रसंगात ती कणाकणाने पराभूत होत जाते.

असो, स्वतःविषयी खूप झालं..आता सरांच्या पुस्तकाविषयी...सरांचे सर्वच लेख छान आहेत, त्यातही 'मन्या' या बोक्याबद्दलचा लेख 'म्यांव', लीलावेली अम्माचा लेख 'सुंदर वृद्धत्व', 'साहब का करे? असेच इतरही लेख मनाला भिडतात..आपल्याला अंतर्मुख करतात..

मी वाचलं, वाचल्यावर सवयीनुसार लेकीलाही सांगितले..या लेखांमधून आलेला K.E.M. हॉस्पिटल आणि त्याच्या आसपासचा परिसर तिच्या नेहमीच्या पाहण्यातला..याच वर्षी तिला G. S. Medical college ला 'फ़िजिओथेरेपीला' admission मिळालं..डॉ. संजय ओक आधी लेखक म्हणून आणि आता संचालक (वैद्यकीय शिक्षण, प्रमुख रुग्णालये)-के.ई.एम. म्हणून त्यांच्याविषयीचा आदर अधिकच दुणावला..

सरांनी अनेक गरीब आणि गरजू लोकांच्या वैद्यकीय मदतीसाठी 'Poor Box Fund' ला आपल्या पुस्तकांच्या विक्री-मानधनातून मिळणारी सर्व रक्कम देणे, त्यांची साईट पाहिल्यावर जाणवणारे त्याचे मोठेपण ..त्यांच्याकडे चालत आलेले अनेक मानमरातब..त्यांनी मिळवलेल्या अनेक पदव्या, त्यांच्या कार्याची शासनाने घेतलेली दखल, अनेक बक्षीस, मा. श्री. अब्दुल कलाम यांच्या हस्ते स्वीकारलेला सन्मान आणि या सर्वापेक्षाही शब्दात कधीच न मांडता येणारे, त्यांना मिळालेले लोकांचे शुभाशीर्वाद..

त्यांचा ' Rope walk' लेख वाचून संध्याकाळी लेकीशी बोलताना तिला तिच्या अभ्यासासंदर्भात 'डोंबा-याच्या मुलीचे' उदाहरण दिले..सरांनी लिहिलंय " हा rope walk' च अस्तित्वाची लढाई आहे..दोरीचं दुसरे टोक गाठलं तर चार टाळया आणि आठ-बारा आण्यांची बक्षिशी आहे. आणि दुर्दैवाने लक्ष विचलित झालं, तोल गेला आणि पडून पाय मोडला तर...म्हणून जनहो कितीची गोंगाट होऊ दे; बसचा हॉर्न, रिक्षाचा भोंगा, पाठीमागच्या इमारतीचा slab टाकणारे मशीन या सगळ्याच्या पलीकडे डोंबारी-कन्येला दिसतंय ते फक्त दोरीचं दुसर टोक; आणि कानावर पडताहेत ते बापाने वाजवलेले चामड्याच्या हलगीवरचे कडाडणारे बोल..

तिला म्हटले तुलाही असाच अभ्यास करायचा आहे..अनेक प्रलोभन तुझ्या वाटेत येतील पण तुला तिकडे दुर्लक्ष करीत आपलं लक्ष्य गाठायचंय...तिला माझ बोलण पटत गेल्याची साक्ष तिच्या डोळ्यात दिसली आणि एक चांगले पुस्तक वाचल्याचे समाधान मनात उमटले..

सरांची website : www.sanjayoak.com

 

सौ. रत्ना संजय हिले
कल्याण (डी. ओ. १७०५००)

२.१२.२०११


 
Type in:

आपलं स्वागत



RocketTheme Joomla Templates