महत्वाच्या बातम्या
८५ व्या मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ कवी श्री. वसंत आबाजी डहाके यांची निवड Print E-mail
यांच्या द्वारा - लोकसत्ता प्रतिनिधी   

मुंबई, १६ डिसेंबर २०११ / प्रतिनिधी
alt

चंद्रपूर येथे २, ३ आणि ४ फेब्रुवारी २०१२ असे तीन दिवस होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी वसंत आबाजी डहाके यांची निवड करण्यात आली असून त्यांना सर्वाधिक ३७४ मते मिळाली.  यानिमित्ताने लघु नियतकालिक चळवळीतील साहित्यिकास प्रथमच संमेलनाच्या अध्यक्षपदाचा सन्मान मिळाला आहे.

यंदाच्या संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डॉ. प्रतिमा इंगोले, प्रा. जवाहर मुथा यांनीही अर्ज दाखल केले होते. एकूण ५६९ मतपत्रिका  महामंडळाला प्राप्त झाल्या. त्यापैकी १९ मतपत्रिका अवैध ठरल्या. वैध ठरलेल्या ५५९ मतपत्रिकांमधून सर्वाधिक ३७४ मते वसंत आबाजी डहाके यांना मिळाली तर डॉ. प्रतिमा इंगोले यांना १५९ आणि प्रा. जवाहर मुथा यांना केवळ १७ मते मिळाल्याचे निर्वाचन अधिकारी डॉ. यशोधन दिवेकर यांनी पत्रकार परिशदेत सांगितले.

यंदाचे ८५ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन चंद्रपूर येथील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे होणार असून सर्वोदय शिक्षण मंडळ आणि सरदार पटेल मेमोरियल ट्रस्ट या साहित्य संमेलनाच्या आयोजक संस्था असल्याची माहिती आज देण्यात आली.  साहित्य संमेलनाचे उद्घाटक आणि स्वागताध्यक्षपदाचे नाव नंतर जाहीर केले जाणार आहे. दरम्यान  माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शांताराम पोटदुखे हे आयोजक संस्थेचे प्रमुख असून त्यांचे नाव स्वागताध्यक्षपदासाठी घेतले जात आहे.     


‘साहित्य संमेलन केवळ उत्सव नाही तर विचारांचे व्यापक व प्रभावी व्यासपीठ’

सोलापूर: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाकडे उत्सवाचे व्यासपीठ म्हणून पाहण्याची भावना वाढत चालली असून हे योग्य नाही. त्याकडे विचारांचे प्रभावी, व्यापक व अधिकृत व्यासपीठ म्हणून पाहण्याची गरज असून या एवढय़ा मोठय़ा व्यासपीठाच्या माध्यमातून आपल्या मनातील विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याची संधी सन्मानासह मिळाली, याचा जास्त आनंद वाटत आहे, अशा शब्दांत  साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांनी मनोगत मांडले.

संमेलनाध्यक्षपदाच्या विजयाचे श्रेय महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील वेगवेगळ्या त्नॠण मित्रांना देत या मित्रांनीच हा आनंदाचा क्षण मिळवून दिला. त्याचे प्रथमत: अभिनंदन करतो. या सन्मानासाठी आपण स्वत: कुठे हिंडलो-फिरलो नाही. केवळ मित्रांनी हा सन्मान मिळवून दिल्याचे डहाके यांनी कृतज्ञतापूर्वक नमूद केले.

चतुरस्र साहित्यिकाला संधी!

शिक्षण, अध्यापन आणि साहित्य विश्वातील एक प्रतिथयश नाव म्हणून वसंत आबाजी डहाके महाराष्ट्रात सर्वपरिचित आहेत. कथा, कविता, निबंध, संपादन, कादंबरी असे विविधांगी साहित्यप्रकार लीलया हातळताना त्यांच्यात दडलेला साहित्यिक अधिक परिपक्व होत गेला. ३० मार्च १९४२ रोजी वणी तालुक्यातील बेलोरा वसंत आबाजी डहाके यांचा जन्म झाला.

चंद्रपूर जिल्ह्य़ात शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच त्यांच्या लेखणीला जशी संधी मिळाली तसे त्यांचे लेखन बहरत गेले. मूळ पिंड कवीचा असल्याने त्यांच्या कवितांना साहित्य क्षेत्रात हळूहळू मान्यता मिळत गेली.
१९७२ साली त्यांचा ‘योगभ्रष्ट’ कवितासंग्रह प्रकाशित झाला. यानंतर त्यांचे शुभ वर्तमान (१९८७), शुन:शेप (१९९६), चित्रलिपी (२००६) हे कवितासंग्रह साहित्यप्रेमींचा ठाव घेणारे ठरले.

‘योगभ्रष्ट’ कवितासंग्रहाचे इंग्रजी भाषांतर ‘टेररिस्ट ऑफ स्पिरिट ’ १९९२ साली प्रकाशित झाले. कादंबरी लेखनात पाऊल टाकल्यानंतर त्यांच्या ‘अधोलोक’ (१९७५), ‘प्रतिबद्ध आणि मर्त्य’ (१९८१) या कादंबऱ्यांनी रसिकांच्या मनात स्थान मिळवले. ‘मालटेकडीवरून’ हा त्यांचा ललित लेखसंग्रह (२००९) प्रकाशित झाला. साहित्यतील समीक्षा हा वाङ्मय प्रकार त्यांनी उत्कृष्ट हाताळला. ‘समकालीन साहित्य’ (१९९२), ‘कवितेविषयी’ (१९९९), ‘मराठी साहित्य : इतिहास आणि संस्कृती’, ‘मराठी समीक्षेची सद्य:स्थिती’ (२०११) या त्यांच्या समीक्षा साहित्यातील मैलाचा दगड ठरल्या आहेत.

निबंध लेखनातही ठसा उमटवताना त्यांनी ‘यात्रा - अंतर्यात्रा’ (१९९९९) या निबंधातून स्वत:ची वेगळी ओळख करून दिली. संपादन हाताळताना त्यांनी ‘निवडक सदानंद रेगे’ (१९९६), संक्षिप्त मराठी वाङ्मय कोश (खंड १ ते ३, १९९८, २००४), ‘वाङ्मयीन संज्ञा - संकल्पना कोश’  (२००१), ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : अ फोटोबायोग्राफी’ चे संपादन केले.

साहित्य क्षेत्रात दिलेल्या चतुरस्र योगदानासाठी वसंत आबाजी डहाके यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. कादंबरी आणि कविता लेखनासाठी त्यांना महाराष्ट्र राज्य पुरस्काराने १९८१ आणि १९८७ साली गौरवण्यात आले. २००५ साली त्यांना महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार प्राप्त झाला. विदर्भ साहित्य संघाने त्यांना २००९ साली जीवनव्रती या अत्यंत प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविले. ‘चित्रलिपी’साठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार देण्यात आला.

याशिवाय कविवर्य अत्युत कारे आणि पुणे मराठी ग्रंथालयाचे पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत. मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानने २०१० साली त्यांचा शांता शेळके पुरस्काराने गौरव केला. प्रारंभीच्या काळात चंद्रपूर आणि अमरावतीला अध्यापन केल्यानंतर मुंबईत शासकीय महाविद्यालयात व्याख्याता म्हणून त्यांनी १९७१ ते २००२ पर्यंत काम केले. याच काळात ज्येष्ठ साहित्यिक प्रभा गणोरकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला.

वसंत आबाजी डहाके यांनी मुंबईतील स्टेट इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर्स,  मुंबई विद्यापीठ आणि पुण्याच्या यशदातही अध्यापन करून ठसा उमटवला आहे.

लोकसत्ता

 
ज्येष्ठ व्यंगचित्रकार मारिओ मिरांडा कालवश Print E-mail
यांच्या द्वारा - अभिजित ताम्हणे - लोकसत्ता   

mario_2

.

mario

.

mario_1

पणजी, ११ डिसेंबर २०११
ज्येष्ठ व्यंगचित्रकार मारिओ मिरांडा यांचे रविवारी सकाळी लोटली (गोवा) येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी आणि दोन विवाहित मुलगे आहेत. मारिओंच्या इच्छेनुसार त्यांच्या पार्थिवाला उद्या, सोमवारी अग्नी दिला जाणार आहे.

पद्मश्री (१९८८) आणि पद्मभूषण (२००२) या किताबांचे मानकरी ठरलेल्या मारिओ यांनी व्यंग्य शैलीत लोकजीवनाची चित्रे केली, त्यांची प्रदर्शने २२ देशांत भरली. अमेरिकेच्या सरकारी निमंत्रणावरून १९७४ मध्ये केलेला त्या देशाचा दौरा आणि तिथे ‘पीनट्स’ या कॉमिकचे निर्माते चार्ल्स शूल्ट्झ यांच्यासह काम करण्याची मिळालेली संधी ही आयुष्यातली मोठी उपलब्धी होती, असे मारिओ सांगत.

मुंबईला कर्मभूमी मानणारे मारिओ निवृत्तीनंतर गोव्यातच राहिले. मुंबईतले सहकारी गेऱ्हार्ड डकुन्हा, दिवंगत कादंबरीकार मनोहर माळगावकर अशा मोजक्या मित्रांनी मारिओ यांच्याविषयी वेळोवेळी लिखाण केले आहे.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अभिजात लोकचित्रकार!
mario_3

मारिओ मिरांडा यांनी अर्धशतकाहून अधिक काळ, भारतीयांना स्वत:चे, स्वत:च्या समाजजीवनाचे प्रतिबिंब ठरणारी चित्रे पाहण्यास प्रवृत्त केले. खरेतर, ही चित्रे मजेदार असू शकतात आणि ‘एन्जॉय’ करता येऊ शकतात, हे मारिओ यांच्याच चित्रांनी भारतीयांना शिकवले. तरीही भारतीय चित्रकलेतल्या आधुनिक कालखंडाच्या इतिहासात मारिओ मिरांडा यांच्या कार्टूनना स्थान मिळणार की नाही, हा प्रश्न आहेच आणि मारिओ गेल्यानंतरही काही वर्षे तो चर्चेत राहील.

दृश्यकलांची संकुचित व्याख्या भारतीयांनी वसाहतिक काळापासून स्वीकारली आहे. ब्रिटिशांच्या ‘रॉयल अकॅडमी’वादी कलाशिक्षण पद्धतीत सरकारी कलाशाळांनी जुजबीच बदल केल्यामुळे तोच संकुचित दृष्टिकोन दृढावत गेला आहे. मारिओ यांनी रूढार्थाने कलाशिक्षण घेतले असते, तर तेही कदाचित, आर्ट गॅलरीत मांडण्यासाठी कार्टूनपेक्षा निराळी चित्रे काढू लागले असते.

ब्रिटिशांच्या अमलाबाहेर, पोर्तुगीज मुलखात मारिओ जन्मले आणि वाढले, त्यामुळेच बहुधा त्यांनी स्वत:चे मुलखावेगळेपण वेळीच ओळखले. त्यावेळच्या गोव्यात ख्रिस्ती वळणाच्या चित्रांखेरीज कुठलाही प्रभाव दृश्यकलेवर नव्हता. काही पोर्तुगीज नवचित्रकारांनी ख्रिस्ती विषय मांडताना या चित्रांमधल्या पात्रांचे चेहरे आणि डोळे ठसठशीतपणे दाखवायला सुरुवात केली होती. बाह्य़रेषेचा वापर होऊ लागला होता आणि रंगभरण रेषेच्या आगेमागे करायचे आहे, रंगांतून चित्र उभे करण्याची जुनी पद्धत वापरायची नाही, याची जाणही त्या चित्रांत वाढू लागली होती.

दुसऱ्या महायुद्धाआधीच्या काळातल्या पोर्तुगीज चित्रांशी मारिओ यांचा संबंध इथेच सुरू होतो आणि इथेच संपतोही. कशाचे चित्र काढायचे, हे मारिओ यांना लवकर कळू लागले, म्हणून प्रभावही मर्यादित राहू शकले. बंगळुरूमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर मारिओ १९५१ या संपूर्ण वर्षांत गोव्यामध्येच ठिकठिकाणी राहिले. नातेवाईक, मित्रमंडळी यांचा पाहुणचार घेत, गोवन समाजजीवनाची रेखाटने करत फिरले. या रेखाटनांचे पुस्तकही पुढे प्रकाशित झाले आहे.

आज सर्वपरिचित असलेली ‘मारिओ मिरांडा शैली’ कशी घडत गेली, हे या १९५१च्या चित्रांमधून दिसते. अगोदर युरोपीय आणि अमेरिकी रेखाचित्रांचा बाज हाताळून पाहणाऱ्या मारिओंनी १९५१ मध्ये लोकजीवन स्वत: पाहून भरपूर रेखाटने करण्यासाठी सुलभीकरणाचे स्वत:चे मार्ग निवडले. रेषांच्या ठरावीक वळणांतूनच मग माणसे त्यांच्या चित्रांत उतरू लागली. चेहरे बदामासारख्या निमुळत्या आकाराचे, पण हनुवटी गोल आणि डोळे तर माशांच्या डोळय़ासारखे गटाणे, असा एक समाज मारिओंच्या चित्रांत दिसू लागला. माणसाचा स्थूलपणा, लुकडेपणा, ‘सेक्रेटरी’चे काम करणाऱ्या युवतीचा हुकमी कमनीयपणा ही शारीर वैशिष्टय़े दाखवण्यासाठी मारिओ यांची परिमाणे अधिकाधिक ठाशीव आणि ठरीवसुद्धा होऊ लागली.

रेखाटनाची ही वैशिष्टय़े, म्हणजे मारिओंच्या शैलीची मुळाक्षरे. त्यांनी जे शैलीविधान केले, ते आणखी पुढले आणि आणखी वरच्या दर्जाचे आहे. मारिओंनी आधुनिक भारतीय जीवनाची समाजचित्रे करताना, एकेका माणसात केवढा परस्परविरोध भरलेला असतो, यावर अचूकपणे बोट ठेवले! समाजात वावरतानाही माणसांची ही ‘फ्लिप साइड’ कशी दिसून येते, हे मारिओंनी नेमकेपणाने वेळोवेळी दाखवले. त्यामुळेच मारिओंचे प्रत्येक समाजचित्र बारकाईने पाहण्याजोगे ठरले. ‘मोजक्या रेषांनी व्यंगचित्र उभे करावे’ वगैरे तत्कालीन संकेत - जे बाळ ठाकरे आणि आर. के. लक्ष्मण या व्यंगचित्रकारांमुळे मापदंडांसारखेच झाले होते, ते - मारिओंनी सहज धुडकावलेच आणि भरपूर छोटय़ा रेषा, क्वचित डिझाइन आणि पोत यांचेही सूचन असणारी भरगच्च चित्रे केली. नेमकेपणापेक्षा खूपच निराळय़ा या वाटेवर मारिओ का गेले, याचे कारण त्यांच्या चित्रांनीच पुढे स्पष्ट केले :

जगावर प्रेम करताना प्रत्येक चल-अचल बारकाव्याचे निरीक्षण आणि त्यावरही प्रेम, हे या चित्रांतल्या भरगच्चपणाचे गमक ठरले. ‘जातीपातींमध्ये विभागलेला, आर्थिक विषमतांत अडकलेला बहुविध समाज मारिओंनी चितारला, पण माणसाचे माणूसपण मात्र नेमके अधोरेखित केले’ असे कलासमीक्षक रणजित होस्कोटे यांनी म्हटले आहे, त्यातली बहुविधता चित्रांच्या भरगच्चपणामुळेच येते. मारिओंनी अनेक वर्षे वृत्तपत्रांसाठी एका रकान्याची ‘पॉकेट कार्टून’ केली आणि तीन चित्रांच्या मालिकाही चालवल्या.

बॉस, सेक्रेटरी, कारकून अशी ठरावीकच पात्रे त्यात असत. सेक्रेटरी अगदी टंच म्हणावीशी असूनही अश्लीलतेची ओरड या चित्रांविरुद्ध झाल्याचे ऐकीवात नाही. लोक जसे असतात, तसेच चित्रांत दिसावेत आणि चित्र म्हणून त्यात आणखी फेरफार करू नयेत, हे सूत्र मारिओंच्या चित्रांनी पाळले होते, म्हणूनच ‘प्रक्षिप्त चित्रणा’च्या आरोपांपासून मारिओ नेहमी दूर राहिले.

मुंबईत एका जाहिरात संस्थेत काम करणाऱ्या मारिओंनी कुठल्याच कामाला नाही म्हटले नाही खरे, पण जे काम केले ते वैशिष्टय़पूर्ण. याचे कारण, ‘हे मारिओच करू जाणोत’ अशी कामेच त्यांच्याकडे आली. मुंबईतल्या ‘माँदेगार’ किंवा अन्य रेस्तराँमधली भिंतचित्रे (म्युरल) असोत की एका थर्मास कंपनीच्या ‘ट्रॅव्हल इन इंडिया’ या मालिकेसाठीची चित्रे, इलस्ट्रेटेड वीकलीमधली बोधचित्रे (इलस्ट्रेशन) असोत की पाठय़पुस्तकांमधली धडय़ा- कवितांसोबतची चित्रे, मारिओंनी सर्वत्र आपला ठसा उमटवलाच.

उतारवयात मारिओ यांनी आर्ट गॅलऱ्यांत प्रदर्शित होऊ शकतील, अशा चित्रांकडे लक्ष केंद्रित केले. गोवा, मुंबईखेरीज जिथे जिथे प्रवास करतील, तिथली चित्रे मारिओ करत असत. यापैकी गोव्याच्या चित्रांचा संच छापील स्वरूपातही उपलब्ध आहे. मारिओंच्या गोव्यात माडांच्या झावळय़ाही जणू प्रसन्नपणे झुलतात आणि निळय़ा आकाशातला शेंदरी सूर्यसुद्धा आजचा दिवस सुशेगाद आहे हेच सांगत असतो.

प्रसन्नपणा मारिओंच्या अन्य अनेक चित्रमालिकांमध्ये दिसतो. माणसातल्या विरोधाभासांचे त्यांचे निरीक्षणही दिसतेच. म्हणून तर, मारिओंच्या चित्रातला गिटार वाजवून पैसे कमावू पाहणारा पथवादक पिकासोच्या ‘ब्लू पीरियड’मधल्या मेंडोलिनवाल्यासारखा खिन्न, उदास दिसत नाही.. जगाबद्दलची त्याची बेफिकिरी मारिओंनी अचूक पकडलेली असते. नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या काळातल्या भारताचा चेहरा मारिओंच्या चित्रांतून चटका लावतो, तो असाही!

मारिओंनी आजच्या आयटी-काळाची आणि एकविसाव्या शतकाची चित्रे केलीच नाहीत, अशी टीका जरूर होईल, परंतु मारिओंनी १९६० च्या दशकातल्या विसंगतीपूर्ण जीवनाचे जे दर्शन घडवले, त्याला पुढे अभिजाततेचे मूल्य प्राप्त होईल. कलाकाराने निव्वळ वैशिष्टय़पूर्ण शैलीवर न थांबता मानवी जीवनाबद्दल आणि एका काळाबद्दल भाष्य करणे, ही अभिजाततेची पूर्वअट मारिओंनी कधीच पूर्ण केल्याचे त्यांच्या निधनानंतर त्यांच्या चित्रांचा अभ्यास करणाऱ्यांना स्पष्ट होईल.

अभिजित ताम्हणे - लोकसत्ता


 
सदाबहार देव आनंद यांचे निधन Print E-mail
यांच्या द्वारा - लोकसत्ता   

.

मैं जिंदगी का साथ निभाता चला गया,
हर फिक्र को धुएँ में उडाता चला गया।

‘हम दोनो’ चित्रपटातील या गाण्याच्या ओळीप्रमाणेच प्रत्यक्षातही बिनधास्त जीवन जगणाऱ्या सदाबहार देव आनंदचा लंडनमध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची वार्ता भल्या सकाळी येऊन थडकताच अवघी चित्रपटसृष्टी स्तब्ध झाली.

आणखी वाचा...
 
ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध आसामी लेखिका इंदिरा गोस्वामी यांचे निधन Print E-mail
यांच्या द्वारा - पीटीआय   

.

आपल्या कथा-कादंबऱ्यांद्वारे आसामी भाषेस ललामभूत ठरलेल्या, ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त लेखिका इंदिरा गोस्वामी यांचे प्रदीर्घ आजारानंतर आज येथे निधन झाले. त्या ६९ वर्षांच्या होत्या. गेल्या फेब्रुवारीत अचानक उद्भवलेल्या मेंदू विकारामुळे त्यांना गुवाहाटी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना दिल्लीस  नेण्यात आले होते. जुलैपासून मात्र त्यांच्यावर गुवाहाटीतील रुग्णालयातच उपचार सुरू होते. काल रात्री त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि  आज सकाळी पावणे आठच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

आणखी वाचा...
 
सारंगीनवाझ उस्ताद सुलतान खाँ यांचे निधन Print E-mail
यांच्या द्वारा - लोकसत्ता   
.

अगदी दोन-तीनदशकांपूर्वीपर्यंत भारतीय अभिजात संगीताच्या दरबारातील अनभिषिक्त राणी म्हणून ज्या सारंगीला कलाकारांनी आणि रसिकांनी डोक्यावर घेतले, ती सारंगी काळाच्या पडद्याआड जाताना पाहणे कुणाही संगीतप्रेमीला क्लेशकारक ठरणारे आहे. सारंगीनवाझ उस्ताद सुलतान खाँ यांच्या निधनाने या क्लेशात भरच पडली आहे.

गाणाऱ्या कलावंताला गाताना जी विश्रांती हवी असते, त्या काळात तंबोऱ्याच्या स्वरांबरोबरच त्या रागाचे स्वरही गुंजत राहिले, तर गाण्याची खुमारी आणखीनच वाढते. गाणाऱ्याच्या सुरात सूर मिसळून त्याच्या आवाजाला भराव मिळण्याचीही आवश्यकता असते. गळ्यातून स्वर बाहेर पडताना निर्माण होणाऱ्या गायकी शैलीतच वाजवल्या जाणाऱ्या सारंगीला गळ्याची सख्खी बहीण म्हणतात, ते याचसाठी.

आणखी वाचा...
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 Next > End >>

JPAGE_CURRENT_OF_TOTAL
Type in:

आपलं स्वागत



RocketTheme Joomla Templates